Tuesday 4 June 2024

शालेय प्रवास आणि दुसरी इनिंग

शालेय प्रवास आणि दुसरी इनिंग
“या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला,
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला”.
लहानपणापासून पप्पा नेहमी सांगतात, क्रिकेट आणि जीवन याचा खूपच जवळचा संबंध असतो. मग ते मला वरील सुनील गावस्करकरचे गाणे ऐकून दाखवत. लहानपणी हे गाणे येवढे जवळचे वाटायचे नाही. पण जसं जसं वय वाढत जाते मग गाण्याचा भावार्थ समजत जातो. क्रिकेट हा असा खेळ आहे जो दोन इनिंगची संधी देतो, ज्या मध्ये तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये जरी शून्यावर वर आउट झाला तरी तुम्ही दुसऱ्या इनिंगला शतक मारू शकतात किंवा पहिल्या इनिंगला शंभर मारून सुद्धा दुसऱ्या इनिंगला भोपळा पण फोडू शकत नाही. यातच जीवनाचे सार येते. कधी कुठल्यातरी परिस्थितीमुळे आपल्याला संधीचे सोने करता येत नाही, तर काही गोष्टी मागेच सोडून दयाव्या लागतात. मग पुन्हा एक इनिंग खेळायला मिळते तुम्हाला. मला मिळाली पण ती सुद्धा ३१ वर्षांनी. ती असते, प्राथमिक शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. जेव्हा दुसरी संधी मिळते ती सढळहस्ते घ्यायची असते, मग विचार करायचा नसतो की ती महाग आहे, दूर आहे, कसे जमणार, करू शकतो का वगैरे वगैरे.
जेव्हा आम्ही विरारवरून मीरा रोड ला शिफ्ट झालो तेव्हा माझ्या पाचवीचा निकाल लागून सहावीत जाणार होतो. तेव्हा मला स्वतःला कल्पना देखील नव्हती की माझ्या प्राथमिक शाळेतल्या मित्रांना पुढील तीन दशके भेटता येणार नाही. पण देवयोगाने आणि कुणालच्या कृपेने २०२३ च्या जानेवारी महिन्यात तो योग आलाच. तो सोहळा खूपच भावनिक असला तरी तो आम्हा प्रत्येकाच्या मनावर कोरला गेला आहे. सर्व शिक्षकांना भेटता आले. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर मी खरंच विचार केला नव्हता की परत या सर्वांना भेटू शकेन आणि परत तोच बाँड निर्माण होईल जसा ३२ वर्षापूर्वी होता, प्राथमिक शाळेत, निस्वार्थ. जेव्हा दोन व्यक्ती काही कारणांनी दूर जातात आणि परत जेव्हा भेटतात, तेव्हा त्या लगेच कनेक्ट होत नाही. मग त्यांचे संभाषण खूपच फॉर्मल होऊन जाते. पण जर त्या दोघांमध्ये एक जरी सामाईक गोष्ट असेल तर सगळी आठवणीची टाइमलाइन उघडत जाते मग गप्पा काही संपायच्या थांबत नाही. खरे सांगायचे झाले तर आमच्या पहिली ते चौथीच्या शाळेच्या आठवणी धूसर होत चालल्या आहेत, पण प्रत्येकजण स्वतःच्या आठवणीचा पेटरा उघडत जातो मग दुसऱ्याला त्या गोष्टीवरून स्वतःची गोष्ट आठवत जाते.. आमच्या पिढी कडे शाळेतल्या सेल्फी नाहीत किंवा कळपातले फोटो देखील नाहीत. असतील तर शाळेच्या गैदरिंग चे काही फोटो. ग्रीटिंग कार्ड सुद्धा नाही. (माझी दुसरीत असणारी मुलगी दर महिन्याला एवरेज २ ग्रीटिंग कार्ड बनवत असते आणि देत सुद्धा असते. त्यासाठी तिला कुठल्या सणाचे किंवा वाढदिवसाचे प्रयोजन लागत नाही. मला आधी वैताग यायचा किती कागद फुकट घालवले म्हणून. पण आता नाही. ३०/४० वर्षा नंतर याच सुंदर आठवणी तयार होतील)
परत मागच्या महिन्यात, इंडिया ट्रिपमध्ये, या सर्व मित्रांना भेटण्याचा योग आला. भेटण्याचे ठिकाण विरार ठरवले आणि निवांत गप्पा झाल्या. सुरवातीला वाटले आज काही जास्त मित्र नाही भेटत. पण जसं जसे एक एक जण ऐड होत गेला तसे तो त्याच्या क्लोज़्ड काँटॅक्ट मधल्या मित्राला कॉल लावायचा मग भावनिक आवाहन करायचा. मग तोच,फोनच्या विरुद्ध बाजूला असणारा मित्र, दुसऱ्या मिनिटाला समोर हजर 😃 गप्पा येवढ्या वाढल्या की मला विरार- चर्चगेट लास्ट लोकल मिळेल की नाही याची जाणीव खूपच उशिरा झाली. सगळ्या आठवणींची पारायने झाली, मग तो शाळेचा घरापासून प्रवास असुदे किंवा शाळेमध्ये आणि बाहेर मिळणाऱ्या खाण्याच्या गोष्टी. तसे पण खिशात पैसे नसायचे. आमची आईवडिलांची पिढी ही बहुतेक पहिली पिढीच जी स्थलांतरीत असेल मुंबई मध्येच, किंवा ठाणे मध्ये. त्याकाळी मुंबईत घर घेणे जमत नाही म्हणून पार डोंबिवली, विरार, अंबरनाथ या “गावी” स्थिरावरणारी. त्यामुळे सगळीच काटकसर. तेव्हा तिसरीपर्यंत पाटी वर शिक्षण आणि गृहपाठ सुद्धा. प्रत्येक पिढीचा संघर्ष वेगळा वेगळा असतो. लहानपणी विपरीत स्थिती असून सुद्धा आम्ही सर्व शाळकरी मित्र या मुक्कामी वर पोहचलो आहोत ते बघून आमच्या शिक्षकांना आणि आई वडिलांना आनंद नक्कीच होत असेल.
त्यावेळी शाळेत येणे जाणे म्हणजे सुध्दा एक कसरत होती हे जर आज सांगितले कुणाला पटेलच असे नाही. प्रवासाच्या दृष्टीने विरार आणि भायंदर च्या दोन्ही शाळा माझ्यासाठी पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव टोकासारख्या होत्या. त्याकाळी विरार एक सुंदर गाव असल्याने आणि आम्ही चाळीत राहत असल्याने एका लहान मुलाला लागते तशी सपोर्ट सिस्टम जबरदस्त होती. खेळायला भरपूर मुले, मैदान, आणि तावडे, परांजपे, पांढरे, भोळे, पाटील सारखे उत्तम शेजारी असल्यामुळे विरारची शाळा घरापासून लांब असली तरी दगदग, एकटेपणा, असुरक्षितपणा नव्हता. पहिली ते चौथीची शाळा दुपारची असल्यामुळे आणि आई-वडील कामानिमित्त सकाळीच बाहेर पडत असल्याने, तावडे आजी कडे राहून गरम स्वादिष्ट जेवणाची सवय होती. मग नंतर पाचवीला दुपारी शाळेतून आल्यावर तावडे आजीकडे गरम जेवण रेडी असायचे.( त्याकाळी नर्सरी/डे केअर अश्या कन्सेप्ट नव्हत्या. आमच्या शेजारी, तावडे आज्जी म्हणजे सबकुच. त्या आम्हाला सांभाळण्याबरोबरच, स्वादिष्ट कोकणी स्टाइलने जेवण आणि गोडी डाळ सुंदर बनवायच्या आणि मी त्यावेळी पक्का मांसाहारी असून सुद्धा त्या डाळीची अधाशासारखी वाट बघायचो. त्या डाळीची चव विरार सोडल्यानंतर आयुष्यात परत कधीच मिळाली नाही). पाचवीत असताना स्वतःहून शाळेत जायची सवय होती आणि प्रवास पण वेगवेगळ्या ऋतुत सुंदर होत असे (हो, तेव्हा आजचा सारखा फक्त कडक उन्हाळा आणि लहरी पाऊस असे दोनच ऋतू नव्हते. गुलाबी थंडीत अप्रतिम असे वातावरण असे आणि आम्ही स्वेटर घालून शाळेत जात असू). वाटेमध्ये आम्ही कुणाच्या घराच्या परसातून, शेतातून जायचो. कुणाच्या बागे मधून उगाच मिरची किंवा इडलिंबू तोड, कल्पेशच्या घराखालील असलेल्या छोट्या कंपनीच्या आवारातील केसाच्या पिना उचल असे उद्योग शाळेतून परत येताना करत असू. पण मीरा रोडला शिफ्ट झाल्या नंतर या प्रवासाने ३६० डिग्री वळण घेतले.
तेव्हा मीरा रोडला फक्त स्टेशन जवळील एरिया (शांती नगर) डेव्हलप झाला होता. चाळसंस्कृती पासून फारकत घेऊन फ्लॅट संस्कृती स्वीकारणे माझ्या सारख्या सहावीच्या मुलाला तरी जबर धक्का होता. मित्र नाही, खेळायला मैदान नाही, शेजारी पण नवे. आई-वडील कामानिमित्त सकाळीच बाहेर पडायचे मग जे काही असेल घरी ते खाऊन आम्ही दोघे भाऊ शाळेसाठी बाहेर पडत असू.
आम्ही भायंदर-काशिमीरा हाईवे जवळ घर घेतले जिकडे पहिले सहा महिने आमचीच एकमेव बिल्डिंग होती, बाकी आजूबाजूला मिठाघरे आणि मँग्रोव्हसची झाडी होती. नंतर भयंकर वेगाने २०/३० बिल्डिंगची कामे सुरु झाली आणि रस्ते नसताना सुद्धा अवजड वाहनाची वाहतूक सुरू झाली. (तेव्हा टाटा डंपरची दहशत जबरदस्त होती. हे डंपर वाहन म्हणजे GTL गेम होता त्या काळी, प्रत्येक आठवड्याला हाईवेवर एक तरी अपघात ठरलेलाच असायचा). तेव्हा मोठी शाळा फक्त भाईंदरला असल्याने, १० वर्षाचा मी आणि ५ वर्षाचा भाऊ, दोघांचा प्रवास पावसाळ्यामध्ये कुळीदाच्या पिठीसारखे होणारे पिवळया कच्च्या रोड वरून सुरु झाला. ९ ते ११ मिनिटांचा वॉक होता घरापासून हायवे पर्यंत. मग बेस्ट बसची वाट बघून अजून २०/३० मिनिटांचा प्रवास होता शाळेपर्यंत. घरापासून ते शाळेचा प्रवास एक किंवा सव्वा तासाचा होत असे. माझ्या वर्गातल्या सहावी-फ बहुतेक सर्व विद्यार्थांची स्थिती तशी होती. कारण ती तुकडी ही वेगवेगळ्या स्थलांतरांची होती. कोणी मुंबई बाहेरून तर कोणी दक्षिण/मध्य मुंबईतून भायंदर, मिरारोड, काशिमीराला स्थलांतरित झाले होते. ही मुले पार होटल अजित पैलेस (दहिसर चेक नाका), काशिमीरा, सिल्वर पार्क पासून भायंदरच्या शाळेत येत होती. कित्येकदा एकपदरी रोड आणि अवजड वाहनांमुळे अपघात नित्याची बाब होती भाईंदर-काशिमीरा रोड वर. मग ट्रॅफिकजॅम आणि परत १०-२० मिनिटांची पायपीट मध्येच बसमधून उतरून. हुश्य.. सगळा वेळ आणि शक्ती प्रवासात खर्ची होत असल्यामुळे माझ्या सारख्या प्रवासी मुलांचा प्रगती आलेख सुरवातीच्या वर्षात घसरला होता. पण नंतर परिस्थिती सुधारली. ओळखी वाढून आम्ही काही जणांनी मिळून रिक्षाची सोय केली, ७-क पासून चांगले शिक्षक मिळत गेले आणि घसरलेली गाडी काही प्रमाणात रूळावर आली. आजही जेव्हा जेव्हा मेमरी लेन उघडली जाते तेव्हा मन मात्र मानत नाही की ६ आणि ११ वर्षाच्या मुलांनी हा ओबोडधोबोड प्रवास एकटा कसा केला असेल.
काहीही म्हणा आठवणींचा हा खेळ मजेशीर असतो. तुम्हांला चांगल्या आणि सुंदर आठवणी स्वतःला शोधून काढाव्या लागतात आणि खराब आठवणी मात्र आपोआप समोर येत असतात.
थैंक यू मित्रांनो माझी विरारची संध्याकाळ अविस्मरणीय केल्याबद्दल.

No comments:

Post a Comment